शुक्रवार, २६ एप्रिल, २०१३


एप्रिल २६

कमजोरी - strong point सोबतच weak points सुद्धा नायकाला अभिव्यक्त establish व्हायला मदत करतात. काही वेळेला तो अन्याय सहन करतो का करतो तर त्याची आई खलनायकाच्या तावडीत असते. आई हि त्याची कमजोरी असते तरीही त्याच्या character ला बळ देते. आई साठी तो मार खातो तरीही प्रेक्षकांची सहानुभूती मिळवतो. कधी नायक भित्रा सुद्धा असू शकतो, त्याचा भित्रेपणा त्याच्यातल्या माणसाला जास्त जिवंत करतो. आणि मग तो त्याच्या स्वत:च्या आतील भीतीवर विजय मिळवतो. आणि अचानक मोठा संघर्ष बघायला देतो तेव्हा सुखद आश्चर्य युक्त धक्का देतो. नायकच्या आतील कमजोरी त्याच्या हव्या असलेल्या धेय्याला मिळवण्याचा प्रवास कठीण करतो त्यामुळे अनिश्चितता वाढवते आणि त्यामुळे कथेमध्ये रंगत येते. नायकाच्या स्वभावात असलेल्या कमजोरी मुळे कधी तो अचानक संकटात अडकतो. प्रेक्षकांना हाही धक्का कथेशी एकरूप करू शकतो. कल्पक लेखक नायकाच्या एखाद्या कमजोरी चच शेवटी भांडवल करून खूप गोड आश्चर्य युक्त धक्का देवून मोठ्या संकटातून त्याला वाचवतो. नायका साठी वेगवेगळ्या शक्ती आता पर्यंत खूप वापरून झाल्या आहेत. आता वेळ आहे नायकाच्या एखाद्या कमजोरितुन तो कसा उभा राहतो. आणि संघर्ष करतो आणि त्याला हवी असलेली गोष्ट त्याचे ध्येय मिळवतो. आपण निवडलेली लगान काय आहे ? तेच भुवन हा क्रिकेटच्या बाबतीत कमजोर व्यक्ती आहे आणि तो त्या साठी स्वत:ला पूर्ण योग्य बनवतो, एक सशक्त टीम बनवतो आणि जिंकतो. आपल्या कमजोरी वर खुबीने मात करणे आणि युक्तीने त्या बाबतीत बलवान असलेल्या वर विजय मिळवणे खूप सुखावणारे असते.

अंर्त:मन (Subconscious Mind) - सिनेमा पहाणे हा एक भावनिक अनुभव असतो. कुणीही सिनेमा काहीतरी ज्ञान मिळवण्या साठी बघत नाही. काहीही शिकण्या साठी सिनेमा बघायला जात नाही. माणूस सिनेमा पाहतो तो त्याच्या मानसिक अवस्थेला सुखावण्या साठी. स्वत:ला विसरण्या साठी. त्या दोन तासात त्याला जर त्याच्या काही विवंचना ची आठवण झाली तर आपण फेल झालो असे समजावे. पण जर का त्या दोन तासात त्याला त्याच्या व्यावसाईक घरगुती समस्यांची आठवणही झाली नाही. तो पूर्णत: कथेमध्ये स्वत:ला विसरला आणि ज्यावेळी पडदा सफेद झाला त्यावेळी एका अदभुत अनुभवातून बाहेर आला. त्याला  स्वत:ला सावरावे लागले तर आपण फिल्म मेकर म्हणून जिंकलो असे समजावे. मग हा असा अनुभव त्याला पुन्हा पुन्हा घ्यावासा वाटतो आणि तो पुन्हा पुन्हा तो सिनेमा पाहतो. त्याच्या मित्र परिवारात आवर्जून तो सिनेमा बघण्यासाठी प्रवृत्त करतो. आणि तुमचा सिनेमा सुपर हिट होवू शकतो.
पण हे करण्यासाठी तुम्ही त्याला भावनिक करण्या शिवाय दुसरा मार्ग नाही. आणि हा भावनिक अनुभव देण्यासाठी तितक संवेदना शील मन आपल्या अभिनेत्याच असायला हव. महत्वाच हे की तुमच्या कथेमधील व्यक्तिरेखा देखील तितक्या संवेदनशील असायला हव्यात. फक्त नायक नाही तर सर्व व्यक्तिरेखा मनाला भिडणाऱ्या असायला हव्यात. अगदी खलनायक सुद्धा ! पण कथा सर्वात जास्त नायकाची असते म्हणून हा गुण नायक कडे परिपूर्ण स्वरुपात असावा. त्याच्या प्रत्येक कृती तून त्याच्या प्रत्येक वाक्यातून प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला गेला पाहिजे. आणि ती क्षमता लेखकांनी निर्माण करून ठेवलेली पाहिजे. आपल्या चिंतनातून विचार प्रक्रियेतून ह्या व्यक्तिरेखा घडवल्या गेल्या तर त्या परिपूर्ण होतात. आपल्या सभोवताली आपण पाहतो ऐकतो त्यातून काही बाही बारीक सारीक लकबी, घटना, आपल्या नायकाच्या वागण्या मध्ये जणू त्या त्याच्याच आहेत अश्या पद्धतीने आणाव्या लागतात. आपल्या नायकाचे अंर्त:मन संवेदनशील आणि अनुभव संपन्न करण्यासाठी सखोल अभ्यासाची आवश्यकता असते. हा बराच मानसशास्राचा भाग आहे . अश्या स्वभावाचा माणूस अश्या वेळी कसा वागेल ? याचे समर्पक उत्तर आपल्या स्क्रीन प्ले मध्ये मांडता आले पाहिजे तर ते प्रेक्षकांना भावपूर्ण करू शकेल !

गुरुवार, २५ एप्रिल, २०१३


व्यक्तिरेखांचे प्रकार (Types of Character)


खर म्हणजे व्यक्तिरेखांचे प्रकार म्हणण चुकीच आहे. पण ते फक्त आपल्या भाषेच्या सोयीसाठी आपण वापरू यात. म्हणजे निर्देश करण्यासाठी खालील प्रमाणे व्यक्तिरेखांचे प्रकार पाडता येतील.

१ नायक -

यात आपण नायिकेचा ही अंतर्भाव करू . काही वेळा नायक दोन तीन किंवा चार हि असतात. त्यांच्या प्रत्येकाच्या नायिकाही असतात. पण कथेमध्ये चार नायकांना लेखक न्याय देवू शकत नाही. तुम्ही असे सिनेमे पाहिलेत तर सहज लक्षात येईल कि चार नायक असले तरी एक मुख्य नायक असतो. जो सर्वात जास्त आकषर्ण केंद्र ठरतो. बाकीचे त्याला मदत करणारे ठरतात. त्याच्या भूमिका त्या मानाने कमी कार्यशील active असतात. नायक म्हणजे ज्याच्या सोबत कथा चालते, प्रेक्षक ज्याच्या संगतीने कथा अनुभवतात. ज्याला काहीतरी ध्येय असते, त्या ध्येयासाठी तो धडपडत असतो. त्याची ही धडपड पाहण्या सारखी असते. आणि तीच खरी कथा असते. ह्या नायकाच्या ध्येय वरून लेखकाचे लक्ष ढळू नये. सदोदित हे ध्यानात असावे की सर्व बाकीचे characters नायकाची ही धडपड दाखवण्या साठी आहेत. त्यांना आपण सहाय्यक व्यक्तिरेखा म्हणू , या सर्वांना त्यांचे स्वत:चे आयुष्य आहे, त्याचे स्वत:चे ध्येय ही आहे, पण ही कथा त्यांची नाही. नायकाच्या कथेला (म्हणजेच आपल्या मूळ कथेला) बळ देण्यासाठी, नायकाच्या कथेचा भाग म्हणून ह्या व्यक्तिरेखा आलेल्या असतात. त्यांचा तितकाच सहभाग व्हायला हवा असतो. एखादा नायिका प्रधान सिनेमा पहिला तर कळेल, काय होत ? सासू नणंद सुनेला छळतात म्हणजे सुनेच्या व्यक्तिरेखेला उठाव आणतात, सुनेच्या बद्दल प्रेक्षकांच्या मनात सहानुभूती sympathy निर्माण करतात. मग एखादा दीर (नवऱ्याचा लहान भाऊ)  तिला काहीतरी मदत करतो, कशी मदत करतो हे दाखवता दाखवता आपण दिराचीच कथा सांगू लागलो तर मोठा गोंधळ होईल. सुनेची कथा शेवटा पर्यंत सुने सोबत पोहोचली पाहिजे. सुनेवर झालेल्या अन्यायाचा यथार्थ बदला घेतला गेला पाहिजे किंवा जो काही शेवट लेखकाला भावतो तो झाला पाहिजे.
तसा खलनायक ही सहाय्यक च असतो असे म्हटले पाहिजे कारण तो सुद्धा विरोधातून नायकाचे व्यक्तिमत्व उठावदार करीत असतो.
हे सगळ करतांना नायकाला इतका जास्त वाव दिला जावू नये की तो वास्तविक (natural) वाटणार नाही. म्हणजे उदा - नायकाची आई नायका वर अतिशय प्रेम करते. सकाळी ती त्याच्या साठी नाश्ता करून देते. तेव्हा ती त्याच्या हातात नाश्त्याची प्लेट देते त्याचे पाठीवरून हात फिरवते. “घे रा बाळा नाश्ता, कर नीट चावून खा इ. बोलते तो खातो आहे तो पर्यंत त्याच्या जवळ बसते. असे दाखवले तर ते नाटकी वाटेल. पण या उलट तिन  नाश्त्याची डिश ठेवून निघून जात  “लग्न कर पटकन आणि माझी ह्या व्यापातून सुटका कर !आता खूप केल तुमच, मलाही रिटायर होवू दे !” तर ते जास्त natural वास्तविक वाटेल. सर्व characters नायाकाचीच वरवर करत राहिले तर ते कंटाळवाण ही वाटेल.
तर सांगण्याचा मुद्दा काय तर नायकाला सोडायचं नाही आणि अति धरूनही ठेवायचं नाही. त्या प्रमाणे सहाय्यक व्याक्तीरेखाचा ही तोल सांभाळायचा !
एप्रिल २५

बुधवार, २४ एप्रिल, २०१३


उपयोगी संकटे ( Benefit from Problems)
चित्रपट लेखकाला संकटांच्या इतक दुसर काहीही उपयोगी येत नाही. लेखकाला बरीच संकट अशी हाताशी ठेवावी लागतात. कारण गोष्ट मुळात संकटा शिवाय बनत नाही. आणि खुपदा व्यक्तिरेखाला character ला त्याचा स्वभाव दाखवण्या साठी, प्रेम दाखवण्या साठी, तिरस्कार दाखवण्या साठी छोट्या मोठ्या संकटांचा आधार घ्यावा लागतो. कथा सशक्त करण्यासाठी संकट खूप उपयोगी असतात. पण म्हणून नुसती संकटांची रेलचेल नको व्हायला ही काळजी घेतली पाहिजे. आपल्या  MDQ (major dramatic question) पासून आपण भरकटायला नको. व्यक्तिरेखेला त्याचे आवश्यक ते गुण अवगुण दाखवून होताच ती समस्या आटोपून मूळ प्रश्नाकडे वळता आले पाहिजे.
उदा, आपण पूर्वी नोकराचे मालकावर रागावणे आणि नोकरी सोडून जाणे दाखवले आता त्याला दुसरी नोकरी मिळाली कि नाही ? त्याच्या आर्थिक परिस्थिती चे काय झाले हे जर मूळ प्रश्नाशी निगडीत नसेल तर त्याला तिथेच सोडले पाहिजे. आपण नोकराची कथा सांगत नाही आहोत. आपण मालकाची गोची करण्यासाठी नोकराची योजना केलेली आहे. तेव्हा आपण मालका ची गोची झाली आणि त्याचे पुढे काय होते याचा विचार करणे महत्वाचे आहे. ह्या चर्चेचा उद्देश हा की कोणत्या संकटा वर आपण किती वेळ खर्च करायचा ? किती महत्व द्यायचे ह्या बद्दल जागरूकतेने काम करावयाचे आहे.
जेव्हा केव्हा आपल्याला व्यक्तिरेखे बद्दल काही महत्वाचे सांगायचे असेल तर ते सांगण्या पेक्षा ते दाखवता येईल अश्या संकटात त्या व्यक्तिरेखेला टाकावे, पण वरील MDQ विसरण्याचा धोका सांभाळून. कुठल्या संकटाचा किती आधार घ्यायचा आणि समर्पक पाने त्याला बाजूला कसा सारायचा हे काम खुबीने करता आले पाहिजे.
संकटे आणतांना ती खूप तर होत नाहीत ना ? याचा विचार ठेवावा. काहीतरी महत्वाचे सांगण्या साठी संकटे उपयोगी आहेत पण कथेमध्ये सगळ्याच गोष्टींना खूप महत्व देत येत नाही. दुसरा एक धोका असा असतो की एक लहानशी महत्वाची बाब सांगण्यासाठी आपण जे संकट आणतो आहोत ते  मूळ प्रश्ना (जो कथेचा MDQ आहे ) पेक्षा े मोठे व्हायला नको. नाहीतर आपला plot आलेख चुकेल. क्लायामक्स climax हाच सर्वोच्च बिंदू असायला हवा. कारण आपल्याला क्रमाने लहान सहान संकटांना तोंड देत मोठ्या संकटा कडे जायला आवडेल. मोठ्या संकटाला तोंड देवून मग लहान संघर्ष बघण्यात मौज वाटणार नाही.
आणि महत्वाचे तो मोठा संघर्ष नायकाला करायला मिळायला हवा असतो. आपल्या कथेचा आलेख हा नेहमी चढता असावा. अशी हि संकटाची मदत आहे जी लेखकाला संकटात ही आणू शकतो. काही संभाव्य शक्यता आपण लक्षात ठेवू
१ लहान बाबी साठी मोठे संकट आणू नये.
२ मोठ्या नाट्यपूर्ण प्रश्नाकडे दुर्लक्ष होवू देवू नये.
३ घटनांचा क्रम उताराकडे जावू नये.
४ आपण आणलेले संकट दुसऱ्या एखाद्या character ला मारक ठरू नये.
५ ते संकट सयुक्तिक असले पाहिजे. ओढून ताणून आणलेले वाटू नये.
६ संकटाचा मोह टाळावा .

एप्रिल २४

मंगळवार, २३ एप्रिल, २०१३


व्यक्तिरेखा चे आपापसातील संबंध ( Interrelations of characters )

एका कथे मधल्या सर्व व्यक्तिरेखा चा एकमेकाशी काहीनाकाही संबंध असतो च. मैत्रीचा असेल रक्ताच्या नात्याचा असेल, दुष्मनी असेल ! अनोळखी असणे हा देखील संबंध असतो. मग त्यांना एकमेका बद्दल काय वाटते ? हे कथे च्या दृष्टीने खूप खूप महत्वाचे असते. एक दोन character असे असतील कि जे संपूर्ण कथेमध्ये एकदाही भेटत नाहीत. पण सहसा सर्वांचा एकमेकांशी उल्लेख करण्या इतका तरी संबंध जरूर येतो. त्यांना एकमेका बद्दल काय वाटते हे सांगत बसलो तर कथा खूप लांब होणार. त्यात शॉर्ट कट कसे वापरायचे ते नंतर पाहू. पण सर्व characters चे एकमेका बद्दल चे मत विचार लेखकाच्या माइंड मध्ये स्पष्ट clear असायला हवेत. ज्या वेळी तुम्ही संवाद लिहाल त्यावेळी जागा सापडते तिथे ते त्या पद्धतीने व्यक्त करू शकता. त्याच्या त्या छोट्याश्या उल्लेखाने त्याच्या स्वभावाला उठाव मिळू शकतो, अश्या बारीक सारीक हालचाली आणि वक्तव्यांनी words character ला जिवंत पणा येतो. कथेला बळ मिळते. ती अधिक स्पष्ट प्रभावी होते.
आपल्या दोन्ही हातांच एकमेकाशी जे coordination असत तसाच हे आहे.
विशेषत: वैचारिक मतभेद किंवा साहचर्य दाखवणे जर जास्तच कठीण असते. जे जे काही वैचारिक आहे ते सांगणे सोपे असते पण दाखवणे खूप कठीण असते. एखाद्या character  ला कुणाचा राग आला तर तो सांगणार नाही की मला राग येतो आहे. तर तो काहीतरी वस्तू फेकून देईल. नजरेने तसे दर्शवून देईल. म्हणजे काय तर त्याला कृती द्यावी लागेल तरच  त्याची ती अभिव्यक्ती प्रभावी ठरेल. अन्यथा आपण फक्त बोलून सांगितले कि त्याला राग येतो आहे तर ते परिणाम करणार नाही.
समजा हिरोला प्रेयसीची आठवण येते आहे. गाणे टाकावे हा अतिशय सोपा प्रकार आहे पण तितका वेळ नसेल तर काय करणार ? तो स्वत:ची बोलतो कि मला तुझी आठवण येते आहे ! किंवा तो तिचा फोटो पहात बसेल ! खिडकीतून आकाशातला चंद्र बघेल ! हातात फोन घेवून तिला फोन करू का ? तिचा नंम्बर काढेल ! इ. कृती दाखवली तरच तो प्रभावी ठरेल. सिनेमा हे दाखवण्याचे मध्यम आहे. आणि आपसातील संबंध विचार दाखवण्या तून ह्या छोट्या गोष्टीनी  सिनेमा  मोठा होतो.

एप्रिल २३

सोमवार, २२ एप्रिल, २०१३


व्यक्तिरेखा आणि कथा (Character and Story)

आपल्या व्यक्तिरेखा characters आपली गोष्ट सांगतात. आपण त्याच्या तोंडून बोलतो जणू आपण बोलतच नाही, आपण त्यांना बोलायला लावतो. जणू हि त्यांचीच गोष्ट आहे. आपण त्यांना जीवंत करतो, काही काळापुरत का असेना त्या अर्थाने ती गोष्ट आपली न रहाता त्यांची होते. अगदी तसेच जसे ईश्वराने ( किंवा ज्या नैसर्गिक निर्मिती करणाऱ्या शक्तीला आपण मानतो ती) आपणाला जन्म दिला, हे शरीर दिल, मन दिलं, आपण जिवंत आहोत पण स्वतंत्र आहोत. आपण काय कराव हे आपण ठरवतो. आपण काय बोलाव ते आपण बोलतो. ती शक्ती (ईश्वर) आपल्याला बळजबरी करीत नाही कि आपण काय बोलावे ? कसे वागावे ? इ. आपण गाणे ही गावू शकतो किंवा शिव्याही देवू शकतो. पुण्य करण्या इतकीच आपल्याला पाप करण्याची ही मोकळीक आहे. आपण तसे करू नये हे तितकेच खरे !
मुद्दा असा कि आपल्या characters ना आपण तशी मोकळीक दिली तरच ते जिवंत वाटतील आणि महत्वाचे म्हणजे त्यांनी आपली गोष्ट स्वत:ची गोष्ट सांगतो आहोत तशी सांगितली पाहिजे. त्याची गोष्ट वेगळी आणि आपण सांगत आहोत वेगळ तर गडबड होईल. प्रत्येक character आपली ठरलेली गोष्ट सांगणार असायला हव असत. त्याचा तेवढा भाग त्याने इमाने इतबारे सांगावी. म्हणजे लेखकाने त्याला तितकच स्वातंत्र द्याव, आणि अस द्याव कि जणू तो पूर्ण स्वतंत्र आहे. कदाचित तो एका सीन साठी येणार असेल पण त्याचा कार्यभाग त्याच्या दृष्टीने परिपूर्ण असावा. मग एका सीन मध्ये येणारा नोकरही मालकाला झापतो आणि लक्षात राहून जातो.
व्यक्तिरेखा आपली गोष्ट पुढे नेणारी असली तरच ती व्यक्तिरेखा जिवंत वाटते, लक्षात रहाते. आणि विशेष म्हणजे आपली गोष्ट यशस्वी होते. गोष्ट म्हणजे सिनेमा चा आत्मा आहे. बाकी सारे काही शरीर किंवा कपडे अलंकार इ. शरीर आकर्षक तेजस्वी तितका आत्मा सुंदर असणारच म्हणून शरीराला सुंदर करण्याचा शक्य तितका प्रयन्त करावाच पण आत्मा निस्तेज असेल तर शरीरला कितीही कपडे अलंकार घातले तरी काहीही उपयोग होणार नाही. सगळा प्रयन्त आत्मा तेजस्वी करण्यासाठी करावयाचा आहे. त्यात व्यक्तिरेखा सर्वात महत्वाचा भाग आहेत. म्हणजे समजा की व्यक्तिरेखा characters हे शरीर आहेत. हात पाय आहेत. ते मूळ शरीराचे च असावेत. कुणाचे हात कुणाचे पाय असा प्रकार जितका विचित्र असेल तितकेच character चे सुद्धा कथेशी आहे.
story सर्वार्थाने त्या characters ची झाली पाहिजे !!

एप्रिल २२

रविवार, २१ एप्रिल, २०१३


हेच ध्येय का ? (Why)

कधी किंवा बर्याचदा लेखक व्यक्तिरेखेला Want ध्येय तर देतो, पण ती त्या character ची स्वाभाविक want झाली पाहिजे. ते त्याचे खरोखर ध्येय आहे असे वाटले पाहिजे, प्रेक्षकांना ते उसन घेतलेलं आहे अस वाटू नये. आपल्याला जर कुणी सांगितलं, खूप पटवून आग्रहाने सांगितलं की तू हे काम कर ! पण जोवर ते आपणास पूर्णत: पटत नाही तो पर्यंत आपण ते करणार नाही. त्याच प्रमाणे आपण character ला दिलेले ध्येय त्याला पटलेले आहे असे वाटले पाहिजे . त्याच्या परिस्थितीला त्याच्या पूर्व अनुभवांना त्याच्या सर्व घटकांना ते संयुक्तिक झाले पाहिजे . हा भाग जरा जास्तच कठीण आहे पण एकदा का आपण आपल्या निर्मिलेल्या व्यक्तिरेखा शी संवाद करायला शिकलो कि ही गोष्ट सोपी होते.
हे सहज साध्य करण्या साठी एक प्रयोग आहे तो करावा. आपली गोष्ट नक्की झाली की ती दोन चार पानात लिहून काढावी. महत्वाच्या व्यक्तिरेखा समोर येतात. त्याच्या want हि निश्चित होतात. त्या प्रत्येक व्यक्तिरेखे चा पूरब इतिहास तयार करावा. जसे नायक समजा त्याचे वय २५  वर्षे असेल तर त्याचा मागील दहा वर्षाचा इतिहास लिहून काढावा. साधारण महत्वाच्या काय घटना ह्याच्या मागील दहा वर्षात घडल्या असतील ? तसेच त्याच्या ही मागील दहा वर्षात काय घटना घडल्या असतील ह्याच प्रमाणे जन्मा पर्यन्त चा काल्पनिक इतिहास तयार करावा. शक्य आहे हा इतिहास आपण पडद्यावर आणणार नाही आहोत. पण तरीही तो पडद्यावरील घटना नक्कीच बलवत्तर करेल. आणि त्याचे ध्येय नक्की करण्यास मदत करते  किंवा ध्येयाला बळकटी आणते.
हा असा व्यक्तिरेखेचा इतिहास तयार केला तर आपल्या व्यक्तिरेखा आपल्या पासून वेगळ्या होतात. आपल्या व्यक्तिरेखा म्हणजे जणू आपल्या प्रतिमा असायला नकोत. आपण त्याचे अनुभव जाणतो, त्याच्या ह्या इतिहासा वरून त्याचा तयार झालेला स्वभाव जाणतो. त्याच स्वरूप आपल्या डोळ्या समोर येवू लागत. हि  व्यक्ती जाड असेल कृश असेल ? कि बुटकी किंवा उंच असेल ? कसे कपडे वापरेल ? केस कसे ? मिशी कशी ? याचे मित्र कसे असतील ? सगळ्या गोष्टी हळूहळू व्यक्त ह्यायला लागतात. आणि मग कुठे काही शंका आली की ह्या अश्या वेळी हि व्यक्ती काय करेल ? तर आपण विचार करू लागलो कि ती आपल्या आतून बोलू लागते मी अमुक वेळी अशी वागले मग आता मी अशी कशी वागेल ? मला हे असच कराव लागेल आणि आपल्यालाही ते मग पटत. निर्विवाद मत तयार होत. अश्या प्रकारे आपल्या मनात व्यक्तिरेखा character च स्वरूप पक्क झाल आणि सगळे characters स्पष्ट झाले कि मग कथा हि तितकीच स्पष्ट होते. सर्व घटनांना सबळ पाठ पुरावा मिळतो. व्यक्तिरेखा ना कंगोरे मिळतात. आणी  त्या जिवंत होतात.

एप्रिल २1

शनिवार, २० एप्रिल, २०१३


व्यक्तिरेखा (Characterisation)

तुमची कथा तुम्ही सांगू शकत नाही. केवळ तुम्ही ती सांगितली तर ती तितकी रंजक होणार नाही. कधी एके काळी एक राजा होता, असे म्हणताच तुम्ही ऐकणार्याच्या डोळ्या समोरून नाहीसे होता त्याच्या डोळ्या समोर तो काळ आणि तो राजा येतो मग तुम्ही जे जे काही बोलत ते राजा बोलतो कधी राणी बोलते तर कधी राजकन्या आणि अशीच कहाणी पुढे जाते. सिनेमा मध्ये तो राजा आणि तो काळ बारीक सारीक तपशिला सहित दिसतो. प्रेक्षक अवती भवती तो काळ ते ठिकाण त्या व्यक्तिरेखा सर काही तंतोतंत अनुभवतो त्या कथेचा एक अविभाज्य भाग बनून जातो. त्यामुळे आपल्या व्यक्तिरेखा character खरोखर जिवंत झाले पाहिजेत. ते जिवंत कसे होतील याचा विचार केला तर सर्वात महत्वाची एक गोष्ट लक्षात येईल ती म्हणजे विविधता ! वेगळे पण !
आपल्या भोवताली पहिले तर दिसेल किती अफाट विविधता आहे. किती झाड आहेत पण एकही दुसऱ्या सारखे नाही. आपण कथा लिहिताना मात्र ही चूक नेहमी होते कि आपले पात्र characters एकसारखे होतात. सहसा नवख्या लेखक कडून असे होण्याची शक्यता जास्त असते. सगळ्या व्यक्ती characters लेखकाच्या सारखच बोलतात. कारण लेखक त्यांना वेगळे पण देण्याच्या भानगडीत पडत नाही. त्याच्या ते लक्षात च आलेलं नसत. पण जरा विचार केला तर हे त्यालाही पटेल. आणि मग तो ते वेगळेपण आणण्याचा प्रयन्त करेल. तर हा characters ना वेगवेगळे पण देण्याचा पर्यंत तरी कसा करावा ? अगदी सोप्प आहे. व्यवहारात पाहिलं तर प्रत्येक माणसाला काहीना काही तरी हव आहे अस दिसेल. तुमच्या घरी तुमचा जवळचा मित्र किंवा भाऊ ही आला तर काहीतरी कामानिमित्त आलेला असतो. माणसाची प्रत्येक क्रिया activity काहीतरी उद्देशाने होत असते. आपल्या कथे मध्ये प्रत्येक character ला हा उद्देश दिला तर त्याच्या मध्ये त्याच वेगळे पण जरूर दिसेल. आपल्या सर्व (साधारणत: ज्यांना संवाद आहे अश्या सर्व) व्यक्तिरेखांना characters ना उद्देश (Goal) द्यायला हवा आहे. यालाच characters want असही म्हणतात. जशी हि want उद्देश असेल त्या प्रमाणे ती व्यक्ती व्यवहार करेल. त्या उद्देशा नुसार ते character दुसऱ्या character कडे जाईल किंवा न जाईल. जाईल तर काय मागेल ? काय बोलेल हे ते character चा स्वत: आपल्याला सांगेल. म्हणजे लेखका च्या आतून ते character सुचित करेल. उदा - पुन्हा लगान, भुवन गोळी कडे जातो त्याला आपल्या टीम मध्ये सामील करण्या च्या उद्देशाने ह्या ठिकाणी भुवन चे ध्येय ठरलेले आहे. पण गोळी चे हि काहीतरी ध्येय असणारच, ते आहे कि त्याला आपली जमीन प्रिय आहे, तिचे रक्षण त्याला करायचे आहे. आणि भुवन हे ओळखून आहे. म्हणून तो त्याला मार्मिक टोमणा मारतो की “ तू काय बाबा एक शेताचा तुकडा विकून लगान भरून टाकशील !” गोळी च्या ध्येयाला ठेच लागते, तो कळवळतो, आणि दुसरा काही मार्ग दिसत नाही तेव्हा भुवनला साथ द्यायला तयार होतो. आता ह्या ठिकाणी विविधतेचा नमुना दिसतो, भुवन ची आणि गोळी ची want ध्येय एक सारखे आहे का ? आहे ……. पण नाही ! कारण त्याच्या मध्ये मुलभुत फरक आहे. भुवन कडे दूरदृष्टी आहे. धैर्य आहे. त्याने सर्व गावकर्यांच्या विरोधात इग्रजांच्या अधिकार्याशी ह्या लढाई ची निवड केली आहे. पण गोलीला फक्त आपले स्वत:चे शेत जमीन वाचवायची आहे. अश्या प्रत्येक खेळाडू मध्ये वेगळे पण दिसते. भुरा हा स्तुतीने भाळून टीम मध्ये येतो, इस्माईल च्या येण्याच कारण आणखी वेगळ आहे, की इंग्रज बाई भुवनला मदत करते आहे आणि आपण गाववाले असून हि वेगळे का ? ह्या प्रश्नाने भंडावून तो येतो. तर लाखा फितूर खेळाडू  बनून येतो. टीम बनते ११ खेळाडू येतात पण प्रत्येकाच्या want ध्येयामध्ये फरक आहे, विविधता आहे. त्यामुळे ते सगळे जिवंत वाटतात. त्याच्या मुळे कथा जिवंत होते. आणि प्रेक्षक भारावून बघतात ……………….  पुन्हा पुन्हा !

एप्रिल २0